शेतकऱ्याच्या मुलाची लग्नाच्या नावाखाली मोठी फसवणूक; नाशिक-सोलापूर टोळीचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा
सोलापूर : शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी लग्न जुळवताना वाढत्या अपेक्षा आणि सामाजिक अडचणींचा गैरफायदा घेत एका संगठित टोळीने मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील दलालांच्या टोळीने एका शेतकरी तरुणाची तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील 24 वर्षीय विशाल धावणे याच्यासाठी वधू शोधताना ही फसवणूक घडली. सोलापूर येथील एका दलालाने नाशिकमधील दलालांशी संपर्क साधून विवाह जुळवण्याचे नाटक रचले. संबंधित महिला अविवाहित असल्याचे भासवून हा विवाह घडवून आणण्यात आला.
ठरलेल्या व्यवहारानुसार दलालांना 50 हजार रुपये तर ‘वधूचे वडील’ म्हणून पुढे केलेल्या व्यक्तीस 2 लाख 50 हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर 7 जून रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे मंदिरात विवाह पार पडला.
मात्र विवाहानंतर काही वेळातच वधू अचानक गायब झाली. यामुळे संशय निर्माण झाल्यावर चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. संबंधित महिला आधीच विवाहित असून तिला तीन मुले असल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुण व त्याच्या कुटुंबीयांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा वणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.
या टोळीमध्ये विना क्रमांकाच्या वाहनातील संशयित, नाशिक-सोलापूर येथील दलाल तसेच काही महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या टोळीने आणखी काही तरुणांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांमध्ये चिंता वाढली असून अशा विवाह फसवणूक टोळ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.


