उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात २०१७ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली होती. या कर्जमाफी योजनेपासून जवळपास ६ लाखांहून अधिक लाभार्थी शेतकरी वंचित आहेत. आता सरकारनं २०२५ मध्ये झालेल्या अधिवेशनात या योजनेंतर्गत ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यांचे वितरण आता करण्यात येणार आहे.याबाबत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार हे शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना राबवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास ८ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील सुमारे ७० हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे येणे बाकी होते. त्या आठही जिल्हा सहकारी बँकांना पैसे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
याचा फायदा ७० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. यात विदर्भातील बँका आहेत. नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा समावेश आहे, असे भोयर म्हणाले. राज्यातील 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील जवळपास ७० हजार खातेदारांना याची मदत मिळणार आहे. त्यांना लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे.
अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमितपणे कर्ज भरणारे शेतकरी यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देणार आहे, अशी माहितीही भोयर यांनी दिली.




