इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावातील मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शशिकांत तुपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






